मुंबई : राज्यभरात इयत्ता. दहावीची शालांत परीक्षा सुरू झाली असून प्रथम भाषा असलेल्या विषयांचे पेपर नुकतेच पार पडले. मराठी प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरणाच्या विभागावर नजर टाकली असता ही प्रश्नपत्रिका नक्की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची आहे की, इयत्ता चौथीच्या घटक चाचणीच्या परीक्षेची, असा प्रश्न पडत आहे.
दहावीच्या परीक्षेत सर्वच जण उत्तीर्ण व्हावेत, अशी इच्छा बाळगत राज्य शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिका काढल्या असल्या, तरीही भाषेची किमान काठिण्यपातळी बाळगणे आवश्यक होते, असा सूर आता शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेसाठी काम करणाऱ्यांमधून उमटू लागला आहे.
Nashik Accident: दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्याचा कारच्या धडकेत मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत सोडला जीव, नाशिक हळहळलं
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या भागात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द लिहा आणि शब्दांचे वचन बदला असे प्रश्न होते. यात समानार्थी शब्दासाठी ‘घर’, ‘नदी’ तर विरुद्धार्थीसाठी ‘रात्र’, ‘हजर’ हे दोन शब्द देण्यात आले होते. शब्दांचे वचन बदलण्यासाठी ‘पुस्तक’ आणि ‘झाडे’ असे दोन प्रश्न होते.
मराठी एकीकरण समितीचे प्रतिनिधी आनंदा पाटील यांनी या प्रकरणी शिक्षण मंडळावर झोड उठवली आहे. ‘केवळ उत्तीर्णांचे प्रमाण वाढवण्यासाठी दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्राथमिक दर्जाचे प्रश्न विचारणे, हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचे अवमूल्यन आहे. गुणवत्तेचा दर्जा राखून विद्यार्थ्यांना प्रगल्भ शब्दसंग्रहाने सक्षम करणे हे शिक्षण विभागाचे आद्य कर्तव्य आहे. अशा साध्या प्रश्नावलीमुळे आपण भावी पिढीच्या शैक्षणिक भविष्याशी आणि मराठी भाषेच्या समृद्धीशी प्रतारणा करत आहोत का, याचा विचार होणे गरजेचे आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Marathi Schools: मुंबईत मराठी शाळांची दैना! तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर, काय कारण?
राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनीही याबाबत संताप व्यक्त केला. ‘आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी घातक आहे. त्यातच आता दहावीच्याव्याकरणाची काठिण्यपातळी एवढी खालावली असेल, तर मग या परीक्षा घेण्यात नेमका काय अर्थ आहे’, असा प्रश्न त्यांनी केला. ‘आठवीपर्यंत पास होत येणारी मुले व सर्वच स्तरातील मुलांचा विचार करता विषयाची काठिण्य पातळी किती असावी याबाबत विचार करायला हवा. व्याकरणाचे प्रश्न सोपे दिसून आले त्यात सुधारणा होऊ शकते. भाषा विकास होऊन ही पिढी पुढे जायला हवी, यात तडजोड नको’, असे मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य सुशील शेजुळे म्हणाले.
