Success Story : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे ती गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची.
मुंबई : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची. मुंबईतील आयटी क्षेत्रात चांगल्या पगारावर काम करत असताना त्यांनी कॉर्पोरेट करिअर सोडून आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि आज सेंद्रिय शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल करणारा यशस्वी व्यवसाय उभारला आहे.
आयटी क्षेत्रातून शेतीकडे वळण्याचा निर्णय
गौरी आणि दिलीप परब हे दोघेही मुंबईतील मोठ्या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंते म्हणून कार्यरत होते. चांगले वेतन आणि करिअरच्या संधी असूनही त्यांना शहरातील धावपळीच्या जीवनापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिठवली या आपल्या गावात परतून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
नोकरी सोडून गावाकडे परतल्यानंतर त्यांनी आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला. कोणते पीक कमी खर्चात आणि अधिक उत्पन्न देऊ शकते, याचा अभ्यास करून त्यांनी ‘लेमनग्रास’ म्हणजेच गवती चहा या औषधी व सुगंधी वनस्पतीची निवड केली.
