Headlines

निवडणुका आणि परीक्षा एकाचवेळी; यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांचा वाढला ताण

निवडणूक कर्तव्य ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक शासकीय जबाबदारी आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर एकाच वेळी परीक्षा नियोजनाची जबाबदारी टाकणे अन्यायकारक ठरत असल्याचा सूर संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया आणि परीक्षा या दोन्ही जबाबदाऱ्यांमुळे मानसिक व प्रशासकीय ताण वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम परीक्षा व्यवस्थापन व गुणवत्तेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या धामधुमीतच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा भार शिक्षकांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. निवडणूक कर्तव्यावर मोठ्या प्रमाणावर नियुक्ती झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकाच वेळी परीक्षा आणि निवडणूक प्रक्रिया सांभाळावी लागत असल्याने तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या जानेवारी २०२६मधील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील काही महानगरपालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी निवडणुका होत असून, या प्रक्रियेसाठी बहुतांश महाविद्यालयांमधील शिक्षकांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी २०२६ च्या परीक्षा ७ ते २२ जानेवारी या कालावधीत नियोजित आहेत. यातील सत्र १ ते सत्र ३ च्या परीक्षा ७ ते १७जानेवारीदरम्यान होत आहेत. याच काळात म्हणजे १५ आणि १६ तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने शिक्षकांसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे.निवडणूक कर्तव्य ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक शासकीय जबाबदारी आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर एकाच वेळी परीक्षा नियोजनाची जबाबदारी टाकणे अन्यायकारक ठरत असल्याचा सूर संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया आणि परीक्षा या दोन्ही जबाबदाऱ्यांमुळे मानसिक व प्रशासकीय ताण वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम परीक्षा व्यवस्थापन व गुणवत्तेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘१६ जानेवारीनंतरच परीक्षा घ्या’ –
अन्य निवडणूक कर्तव्य आणि परीक्षा या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे शिक्षकांसाठी अत्यंत तणावपूर्ण ठरत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच १६ जानेवारीनंतरच सर्व नियोजित परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केली. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले असून, सकारात्मक निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *