मुंबई : चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारताच्या कांदा निर्यातीसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. जागतिक बाजारपेठेतील बदलती मागणी, खरेदीदार देशांची धोरणे आणि वाढती स्पर्धा यामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीवर सातत्याने दबाव जाणवत आहे. निर्यातदारांच्या मते, हा दबाव तात्पुरता नसून जागतिक कांदा व्यापारातील संरचनात्मक बदलांचा परिणाम आहे.
पारंपारिक बाजारपेठांचा कल बदलतोय
भारतीय कांद्याचे मोठे खरेदीदार असलेले बांगलादेश आणि सौदी अरेबिया आता पर्यायी स्रोतांकडे वळले आहेत. बांगलादेशने देशांतर्गत उत्पादन वाढवल्याने आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. तर सौदी अरेबिया येमेन आणि सुदानसारख्या देशांकडून कांद्याची खरेदी वाढवत आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी पारंपारिक बाजारपेठांमध्ये संधी मर्यादित होत आहेत.
उत्पादन वाढल्याने आयातीची गरज घटली
बिझनेसलाइनच्या अहवालानुसार, हॉर्टिकल्चर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी कांद्याचे उत्पादन लक्षणीय वाढवले आहे. परिणामी, हे देश आता आयातीऐवजी स्थानिक उत्पादनावर भर देत आहेत. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर होत आहे.
